Saturday, August 8, 2009

35. मैत्रिण

Maitrin

मैत्रिण

मैत्रिण माझी बिल्लोरी, बुट्टूक लाल चुट्टुक चेरी
मैत्रिण माझी हूं का चूं!, मैत्रिण माझी मी का तू !

मैत्रिण माझी हट्टी गं, उन्हाळ्याची सुट्टी गं,
मैत्रिण माझ्या ओठांवरची कट्टी आणि बट्टी गं !

मैत्रिण रुमझुमती पोर, मैत्रिण पुनवेची कोर
मैत्रिण माझी कानी डूल, मैत्रिण मैत्रिण वेणीत फूल!

मैत्रिण मांजा काचेचा, हिरवा हार पाचूचा
बदामाचे झाड मैत्रिण, बदामाचे गूढ मैत्रिण

मैत्रिण माझी अशी दिसते, जणू झाडावर कळी खुलते
ओल्या ओठी हिरमुसते, वेड्या डोळ्यांनी हसते

मैत्रिण माझी फुलगंधी, मैत्रिण ञाझी स्वच्छंदी
करते जवळीक अपरंपार, तरीही नेहमी स्पर्शापार

मैत्रिण सारे बोलावे, मैत्रिण कुशीत स्फुंदावे
जितके धरले हात सहज, तितके अलगद सोडावे

मैत्रिण माझी शब्दांआड लपते, हासुनिया म्हणते,
पाण्याला का चव असते, अन् मैत्रिणीस का वय असते

मैत्रिण, थोडे बोलू थांब, बघ प्रश्नांची लागे रांग
दुःख असे का मज मिळते, तुझ्याचपाशी जे खुलते

मैत्रिण माझी स्वच्छ दुपार, मैत्रिण माझी संध्याकाळ
माझ्या अबोल तहानेसाठी मैत्रिण भरलेले आभाळ

32. तुटले

तुटले

आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...
बाकी सारे आकार, उकार, होकार, नकार...
मागे पडत चाललेल्या स्टेशनांसारखे
मागे मागे जात जात पुसटत चालले आहेत...
पुसत जावेत ढगांचे आकार
आणि उरावं एकसंध आभाळ, तसा भूतकाळ
त्याच्या छातीवर गवताची हिरवीगार कुरणं,
भरून आलेली गाफील गाणी, काळेसावळे ढग
आणि पश्चिमेच्या वक्षाकडे रोखलेले बाणाकृतीतील बगळे
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

बंध रेशमी तुझ्यासवे जे जुळले
अन् क्षितिजावर रंग नवे अवतरले
घन दाटताच एका क्षणात हे रंगबंध विस्कटले...तुटले....

विसरत चाललोय... नावेतून उतरताना आधारासाठी धरलेले हात
विसरत चाललोय होडीची मनोगते, सरोवराचे बहाणे,
वा नावेला नेमका धक्का देणारी ती अज्ञात लाट
ती लाट तर तेव्हाच पुसली... मनातल्या इच्छेसारखी
सरोवर मात्र अजूनही तिथेच...
पण त्याच्याही पाण्याची वाफ किमान चारदा तरी आभाळाला भिडून आलेली
आता तर लाटा नव्हे, पाणी सुद्धा नवंय कदाचित
पण तरीही जुन्याच नावाने सरोवराला ओळखतायत सगळे...
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

क्षण दरवळत्या भेटींचे, अन् हातातील हातांचे
ते खरेच होते सारे..वा मृगजळ हे भासांचे
सुटलेच हात आता मनात हे प्रश्न फक्त अवघडले...तुटले...

तुझ्याकडे माझी सही नसलेली एक कविता...मीही हट्टी...
माझ्याकडे तुझ्या बोटांचे ठसे असलेली काचेची पट्टी
चाचपडत बसलेले काही संकेत, काही बोभाटे...अजूनही...
थोडेसे शब्द, बरंचसं मौन...अजूनही...
बाकी अनोळखी होऊन गेलो आहोत...
तुझा स्पर्श झालेला मी, माझा स्पर्श झालेली तू...
आणि आपले स्पर्श झालेले हे सगळे...
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

मज वाटायाचे तेव्हा हे क्षितिजच आले हाती
नव्हताच दिशांचा दोष, अंतरेच फसवी होती...
फसवेच ध्यास फसवे प्रयास आकाश कुणा सापडले...तुटले...

उत्तरे चुकू शकतात, गणित चुकत नाही...
पावले थकू शकतात, अंतरे थकत नाहीत...
वाळूवरची अक्षरं पुसट होत जातात..
डोळ्यांचे रंग फिकट होत जातात..
तीव्रतेचे उग्र गंध विरळ होत जातात..
शेपटीच्या टोकावरचे हट्ट सरळ होत जातात..
विसरण्याचा छंदच जडलाय आताशा मला..
या कवितांना, शहरभर पसरलेल्या संकेतस्थळांना...
विसरत चालल्या आहेत..पत्ता न ठेवता निघून गेलेल्या वाटा..
विसरत चालले आहे तळ्यावर बसलेले पश्चिमरंगी आभाळ..
अन् विसरत चालले आहे...
आभाळही गोंदायला विसरणारे हिरवेगर्द तळे
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

मी स्मरणाच्या वाटांनी वेड्यागत अजून फिरतो
सुकलेली वेचीत सुमने, भिजणारे डोळे पुसतो...
सरताच स्वप्न अंतास सत्य हे आसवांत ओघळले...तुटले...

आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

34. तू

तू

गौरगुलाबी चर्येवर

लालकेसरी टिकली टेकलेली...



लालचुटुक ओठांत

गडद गुलाबी गुपिते मिटलेली....



लालगुलाबी वस्त्रांत

सौम्य गुलाबी कांती लपेटलेली...



मंद गुलाबी गंधाची

एक देहकुपी लवंडलेली...



सभोवताल्यांशी राखलेलं

एक फिकटं गुलाबी अंतर...



तू ?... छे! ... तू नव्हेसचं तू;

तू तर गुलाबच्या फुलाचे भाषांतर !!

31. आयुष्यावर बोलू काही या कवितेमधील सीडी मध्ये नसलेली काही कडवी...

आयुष्यावर बोलू काही या कवितेमधील सीडी मध्ये नसलेली काही कडवी...

I am not sure if all of them are by Sandeep, but most of them are for sure.

कुणीच नाही बोलायाला त्याच्यासाठी
झुकून खाली म्हणते अंबर बोलू काही...

खर्ज बोलतो मनात ठेवून तार तमाशा
'मध्या'मध्ये ठेवूनिया स्वर बोलू काही...

रखरखीत हा रस्ता प्रवास करण्याचा
शेवट त्याचा मिळेल तोवर बोलू काही...

जग बदलाची कशास करता इतुकी घाई
आधी बदलू स्वतःस नंतर बोलू काही...

गल्ली मध्ये बोलायाचे कारण नाही
आयुष्याच्या हमरस्त्यावर बोलू काही...

तुमच्या संगे आज मलाही म्हणूदे गाणे
मिटवून सारे मधले अंतर बोलू काही...

(The following two are most likely not by sandeep...)

स्पर्श जरी हे खरे बोलके असती तरीही
करून मौनाचे भाषांतर बोलू काही...

आभाळातून टपटपणारा थेंब टपोरा
मातीचा दरवळ सुटताना बोलू काही...

31. आयुष्यावर बोलू काही या कवितेमधील सीडी मध्ये नसलेली काही कडवी...

आयुष्यावर बोलू काही या कवितेमधील सीडी मध्ये नसलेली काही कडवी...

I am not sure if all of them are by Sandeep, but most of them are for sure.

कुणीच नाही बोलायाला त्याच्यासाठी
झुकून खाली म्हणते अंबर बोलू काही...

खर्ज बोलतो मनात ठेवून तार तमाशा
'मध्या'मध्ये ठेवूनिया स्वर बोलू काही...

रखरखीत हा रस्ता प्रवास करण्याचा
शेवट त्याचा मिळेल तोवर बोलू काही...

जग बदलाची कशास करता इतुकी घाई
आधी बदलू स्वतःस नंतर बोलू काही...

गल्ली मध्ये बोलायाचे कारण नाही
आयुष्याच्या हमरस्त्यावर बोलू काही...

तुमच्या संगे आज मलाही म्हणूदे गाणे
मिटवून सारे मधले अंतर बोलू काही...

(The following two are most likely not by sandeep...)

स्पर्श जरी हे खरे बोलके असती तरीही
करून मौनाचे भाषांतर बोलू काही...

आभाळातून टपटपणारा थेंब टपोरा
मातीचा दरवळ सुटताना बोलू काही...

29. दूरदेशी गेला बाबा... गेली कामावर आई

दूरदेशी गेला बाबा... गेली कामावर आई
नीज दाटली डोळ्यात , परि घरी कुणी नाही !! ध्रु !!

कसा चिमणासा जीव , कसाबसा रमवला
चार भिंतित धावुन दिसभर दमवला
' आता पुरे ! झोप सोन्या..' कुणी म्हणतच नाही !! १ !!

कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी ?
कोणी बोलायाला नाही...कशी व्हावी कट्टी-बट्टी ?
खेळ ठेवले मांडून ... परि खेळगडी नाही !! २ !!

दिसे खिडकीमधुन जग सारे , दिशा दाही
दार उघडुन तरी तिथे धावायचे नाही
फार वाटे जावे परी - मुठीमध्ये बोट नाही !! ३ !!

नीज दाटली डोळ्यात , परि घरी कुणी नाही
दूरदेशी गेला बाबा......

30. करार

करार
चल आता बोलुन घेऊ ! बोलुन घेऊ थोडे !

सुकण्याआधी माती आणि जाण्याआधी तडे !

संपत आलाय पाऊसकाळ ! विरत चाललेत मेघ !

विजेचीही आता सतत उठ्त नाही रेघ !

मृदगंधाने आवरुन घेतलाय धुंदावण्याचा खेळ!

मोरपंखी पिसर्‍यांनी ही मिटण्याची वेळ !

सावाळ्या हवेत थोडं मिसळ्त चाललंय उन्ह !

खळखळणार्री नदी आता वाहते जपून जपून !



चल आता बोलुन घेऊ ! बोलुन घेऊ थोडे !

लक्षात ठेव अर्थांपेक्षा शब्दच असतात वेडे !

मनामधला कानाकोपरा चाचपून घे नीट !

लपले असतील अजुन कोठे चुकार शब्द धीट !

नजरा, आठवण, शपथा . . . सार्‍यांस उन्ह द्यायला हवे !

जाणयाधी ओले मन वाळायला तर हवे !

हळवी बिळवी होत पाहू नकोस माझ्याकडे

माझ्यापेक्षा लक्ष दे माझ्या बोलण्याकडे

भेटण्याआधीच निश्चित असते जेव्हा वेळ जायची !

समजुतदार मुलांसारखी खेळणी आवरून घ्यायची !

एकदम कर पाठ आणि मन कर कोरे !

भेटलो ते ही बरे झाले ! चाललो ते ही बरे !

मी ही घेतो आवरून सारे ! तू ही सावरून जा !

तळहातीच्या रेषांमधल्या वळणावरून जा !

खुदा-बिदा असलाच तर मग त्यालाच सोबत घे !

' करार पूर्ण झाला ' अशी तेवढी दे !

- मौनाची भाषांतरे, संदिप खरे

27. सरीवर सर

सरीवर सर…

दूर दूर नभपार डोंगराच्या माथ्यावर
निळे निळे गार गार पावसाचे घरदार
सरीवर सर..

तडा तडा गार गारा गरा गरा फ़िरे वारा
मेघियाच्या ओंजळीत वीज थिजलेला पारा
दूरवर रानभर नाचणारा निळा मोर
मोरपीस मखमल उतू गेले मनभर
सरीवर सर..

थेंब थेंब मोती ओला थरारत्या तनावर
शहार्‍याचे रान आले एका एका पानावर
ओल्या ओल्या मातीतून भिजवेडी मेघधून
फ़िटताना नवे ऊन झाले पुन्हा नवथर
सरीवर सर..

उधळत गात गात पाय पुन्हा परसात
माती मऊ काळी साय हूर हूर पावलात
असे नभ झरताना घरदार भरताना
आले जल गेले जल झाले जल आरपार
सरीवर सर..

अशा पावसात सये व्हावे तुझे येणेजाणे
उमलते ओले रान रान नव्हे मन तुझे
जशी ओली हूर हूर तरारते रानभर
तसे नाव तरारावे मझे तुझ्या मनभर

28. लागते अनाम ओढ श्वासाना

लागते अनाम ओढ श्वासाना
येत असे उगाच ओठाना
होई का असे तुलाच स्मरताना.....
( तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना )

एकांती वाजतात पैजणे
भासांची हालतात कंकणे
कासावीस आसपास बघताना.....
तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना )

मी असा जरी निजेस पारखा
रात्रीला टाळतोच सारखा
स्वप्न जागती उगाच निजताना.....
( तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना )

आज काल माझाही नसतो मी
सर्वातुन एकटाच असतो मी
एकटेच दूर दूर फ़िरताना.....
( तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना )

25. कसे सरतील सये...

कसे सरतील सये...

कसे सरतील सये, माझ्याविना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना...

पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा
रिते रिते मन तुझे उरे
ओठ वर हसे हसे उरातून वेडेपिसे
खोल खोल कोण आत झुरे
आता जरा अळिमिळी तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावुन हसशील ना,
गुलाबाची फुलं दोन...

कोण तुझ्या सौधातून उभे असे सामसूम
चिडीचुप सुनसान दिवा
आता सांज ढळेलच आणि पुन्हा छळेलच
नभातून गोरा चांदवा
चांदण्यांचे कोटी कण आठवांचे ओले सण
रोज रोज निजपर भरतील ना,
गुलाबाची फुलं दोन...

इथे दूरदेशी माझ्या सुन्या खिडकीच्या पाशी
जडेसर काचभर तडा
तूचतूच तुझ्यातुझ्या तुझीतुझी तुझेतुझे
सारासारा तुझा तुझा सडा
पडे माझ्या वाटेतून आणि मग काट्यातून
जातानाही पायभर मखमल ना,
गुलाबाची फुलं दोन...

आता नाही बोलायाचे जरा जरा जगायाचे
माळूनिया अबोलीची फुले
देहभर हलू देत विजेवर झुलू देत
तुझ्या माझ्या विरहाचे झुले
जरा घन झुरु दे ना वारा गुदमरु दे ना
तेव्हा नभ धरा सारी भिजवील ना,

गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना...

26. मी मोर्चा नेला नाही

मी मोर्चा नेला नाही

मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही
मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही

भवताली संगर चाले, तो विस्फ़ारुन बघताना
कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना
मी दगड होउनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा
तो मारायाला देखिल, मज कुणी उचलले नाही

नेमस्त झाड मी आहे, मूळ फ़ांद्या जिथल्या तेथे
पावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पाने
पण पोटातून कुठलीही, खजिन्याची ढोली नाही
कुणी शस्त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही

धुतलेला सातिव सदरा, तुटलेली एकच गुंडी
टकलावर अजून रुळते, अदृश्य लांबशी शेंडी
मी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो
मी मनात सुद्धा माझ्या, कधी दंगा केला नाही

मज जन्म फ़ळाचा मिळता, मी केळे झालो असतो
मी असतो जर का भाजी, तर भेंडी झालो असतो
मज चिरता चिरता कोणी, रडले वा हसले नाही
मी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही

23. हे भलते अवघड असते

हे भलते अवघड असते

गाडी सुटली, रुमाल हलले, क्षणात डोळे टचकन् ओले
गाडी सुटली, पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झाले
गाडी सुटली, हातामधुनी हात कापरा तरी सुटेना
अंतरातली ओली माया तुटूदे म्हटले तरी तुटेना
का रे इतका लळा लावुनी नंतर मग ही गाडी सुटते
डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते
गाडी गेली फलाटावरी नि:श्वासांचा कचरा झाला
गाडी गेली डोळ्यामधल्या निर्धाराचा पारा फुटला

हे भलते अवघड असते... हे भलते अवघड असते...
कुणी प्रचंड आवडणारे... ते दूर दूर जाताना...
डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना...
डोळ्यातील अडवून पाणी... हुंदका रोखुनी कंठी...
तुम्ही केविलवाणे हसता अन् तुम्हास नियती हसते...

तरी असतो पकडायाचा... हातात रुमाल गुलाबी...
वार्‍यावर फडकवताना... पाह्यची चालती गाडी...
ती खिडकीतून बघणारी अन् स्वतः मधे रमलेली...
गजरा माळावा इतुके... ती सहज अलविदा म्हणते...

तुम्ही म्हणता मनास आता, हा तोडायाचा सेतू...
इतक्यात म्हणे ती - माझ्या कधी गावा येशील का तू?
ती सहजच म्हणुनी जाते... मग सहजच हळवी होते...
गजर्‍यातील दोन कळ्या अन् हलकेच ओंजळीत देते...

कळते की गेली वेळ... ना आता सुटणे गाठ...
आपुल्याच मनातील स्वप्ने... घेऊन मिटावी मूठ...
ही मूठ उघडण्यापूर्वी... चल निघुया पाऊल म्हणते...
पण पाऊल निघण्यापूर्वी... गाडीच अचानक निघते...

परतीच्या वाटेवरती गुदमरून जड पायांनी...
ओठावर शीळ दिवाणी... बेफिकीर पण थरथरती...
पण क्षण क्षण वाढत असते... अंतर हे तुमच्यामधले...
मित्रांशी हसतानाही... हे दु:ख चरचरत असते...

हे भलते अवघड असते….

24. नामंजूर

नामंजूर


जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर!
अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!

मला ऋतुंची साथ नको अन् कौल नको
मला कोठल्या शुभशकुनांची झूल नको
मुहुर्त माझा तोच ज्याक्षणी हो इच्छा
वेळ पाहुनि खेळ मांडणे - नामंजूर!

माझ्याहाती विनाश माझा! कारण मी!
मोहासाठी देह ठेवतो तारण मी!
सुंदरतेवर होवो जगणे चक्काचूर
मज अब्रूचे थिटे बहाणे - नामंजूर!

रुसवे - फ़ुगवे... भांडणतंटे... लाख कळा
आपला - तुपला हिशेब आहे हा सगळा
रोख पावती इथेच द्यावी अन् घ्यावी
गगनाशी नेणे गार्‍हाणे - नामंजूर!

नीती, तत्वे... फ़सवी गणिते! दूर बरी!
रक्तातील आदिम जिण्याची ओढ खरी!
जगण्यासाठी रक्त वहाणे मज समजे,
पण रक्ताचा गर्व वाहणे - नामंजूर!

20. दिवानों की बाते है

दिवानों की बाते है
इनको लबपर लाये कौन ?
इतना गेहेरा जाये कौन ?
खुदको यु उलझाये कौन ?

जो तु समझा अपना था
वो लमहों का सपना था
हमने दिल को समझाया
अब हमको समझाये कौन ?

तेरी गली मे हो आये
होश वही खो जाये
दिख जाये अगर तू पलभर
मैखाने मे जाये कौन ?

गली गली मे फ़िरते है
कई ठोकरें खाते है
जब तुनेही ठुकराया हमे
अब हमको अपनाये कौन ?

दिवानो की बाते है

21. दाढी काढून पाहिला आन् दाढी वाढून पाहिला

दाढी काढून पाहिला आन् दाढी वाढून पाहिला
चेहरा कंटाळवाणा पण अबाधित राहिला

मी सिनेमाला जरी सुरुवातीला कंटाळा लो
फक्त पैसे वसूल व्हावे म्हणून शेवट पाहिला

चार मिळता चार लिहिली ना कमी ना जास्त ही
प्रेमपात्रा ना ही कागद रद्धीचा मी शोधला

नामस्मरणाला सुद्धा दिधली ठराविक वेळ मी
मी किलो आन् ग्रॅम वरती मोक्ष मोजून घेतला

लाल हिरवे दीप येथे पाप पुण्याचे उभे
सोयीचा जो वाटला मी तोच सिग्नल पाळला

मी धुके ही पाहिले आन् धबधबे ही पाहिले
पण तरी मी शेवटी माझाच फोटो काढला

मी पिझा ही चापतो आन् भाकरी ही हाणतो
घास जो पडला मुखी मी तो रवन्थत ठेवला

भोगताना योग स्मरला योगताना भोग रे
राम ही ना झेपला मज कृष्ण ही ना झेपला

मी मला दिसलो असा की ना जसा दिसलो कुणा
कुरूपतेचा आळ कायम आरशावर ठेवला

22. नास्तिक

नास्तिक
एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा खर तर गाभा-यातच भर पडत असते
की कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना,
पण प्रामाणिकपणे चिकटुन राहिल्याच्या पुण्याईची !

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा होते निर्माण
देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची !

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा को-या नजरेने पाहत राहतो
सभोवतालच्या हालचाली, भाविकाच्या जत्रा...
कोणीतरी स्वत:चे ओझे , स्वत:च्याच पायावर
साभाळत असल्याचे समाधान लाभते देवलाच !

म्हणून तर एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदचित !
पण मिळते आकठ समाधान एक सहकारी लाभल्याचे

देऊळ बद झाल्यावर एक मस्त आळस देउन
बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता
देव म्हणतो, " दर्शन देत जा अधुन मधुन........
तुमचा नसेल विश्वास आमच्यावर,
पण आमचा तर आहे ना ! "

देवळाबाहेर थाबलेला एक खरा खुरा नास्तिक
कटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारिने पाठवतो देवळात
तेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन
अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे....

19. उत्कट-बित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू नये..

उत्कट-बित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू नये..
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

नको कुठला नवा भार, जुनेच गुंते शिल्लक फार..
सूर गाठ-नीर गाठ, राहून द्याव्यात, ओढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

असे वाटते बसून घ्यावे, उरले श्वास मोजत रहावे..
जन्मा-बिन्मा आलो त्याचे, पांग सुद्धा फेडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

शिंकांसारखे सोपस्कार, मला झालीये गर्दी फार..
असल्या गळक्या जगण्यासाठी, रूमालसुद्धा काढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

कुठे कधी रमला जीव, खरंच फार दमला जीव..
वजन, ज्ञान, ओळख, पित्त काही-काही वाढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

कसले प्रहर, कसला काळ, मनात कायम संध्याकाळ..
तिच्या कुशीत मांडली कविता, तेवढी मात्र मोडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ७ ॥

17. आताशा.. असे हे.. मला काय होते!!!

आताशा.. असे हे.. मला काय होते!!!
कुण्या काळचे , पाणी डोळ्यात येते.....
बरा बोलता बोलता , स्तब्ध होतो...
कशी शांतता , शून्य शब्दांत येते.......
आताशा.. असे हे .. मला काय होते!!!
कुण्या काळ चे , पाणी डोळ्यात येते!!!

कधी दाटु येता , पसारा घनांचा....
कसा सावला रंग , होतो मनाचा...
असे हालते .. आत हलुवार काही...
जसा सप्र्श पाण्यावरी चाँदण्याचा....

असा ऐकू येतो , क्षणाचा इशारा ...
क्षणी व्यरथ होतो ... दीशांचा पसारा...
नभातुन ज्या .. रोज जातो बुडूनी..
नभाशीच त्या... मागु जातो कीनारा....

न अंदाज कुठले.. न अवधान काही....
कुठे जायचे , यायचे भान नाही..
जसा गंध नीघतो, हवेच्या प्रवासा
न कुठले नकाशे.. न अनुमान काही....

कशी ही अवस्था.. कुणाला कलावे..
कुणाला पुसावे.. कुणी उत्तरावे...
कीती खोल जातो, तरी तोल जातो...
असा तोल जाता.. कुणी सावरावे....

आताशा .. असे हे ..मला काय होते ....
कुण्या काळ चे ,पाणी डोळ्यात येते....
बर बोलता बोलता , स्तब्ध होतो.
कशी शांतता शून्य शब्दांत येते...

आताशा असे हे मला काय होते ....
कुण्या काळ चे पाणी डोळ्यात येते.....

18 असेनही जरी मी सर्वांनी सोडलेलामी फसलो म्हणूनी हसूदे वा चिडवूदे कोणी

मी फसलो म्हणूनी...

संदीप : या कवितेविषयी आधी थोडंसं सांगतो...की हातामधून हात सुटून जातो, पण जे काही थोडे क्षण एकमेकांच्या वाट्याला आलेले असतात, ते मात्र मनामध्ये अमर होऊन रहातात. आणि या क्षणांकडे बघून जे म्हणावसं वाटतं, ती ही कविता -

मी फसलो म्हणूनी हसूदे वा चिडवूदे कोणी
ती वेळच होती वेडी अन् नितांत लोभसवाणी

ती उन्हे रेशमी होती, चांदणे धगीचे होते
कवितेच्या शेतामधले ते दिवस सुगीचे होते
संकेतस्थळांचे सूर त्या लालस ओठी होते
ती वेळ पूरीया होती, अन् झाड मारवा होते

आरोहा बिलगायाचा तो धीट खुळा अवरोह
भरभरून यायचे तेंव्हा त्या दृष्ट नयनींचे डोह
डोहात तळाशी खोल वर्तमान विरघळलेले
अन् शब्दांच्या गाली पाणी थोडेसे ओघळलेले

ती हार असो वा जीत, मज कुठले अप्रूप नाही
त्या गंधित गोष्टीमधला क्षण कुठला विद्रूप नाही
ती लालकेशरी संध्या निघताना अडखळलेली
ती निघून जातानाही, बघ ओंजळ भरूनी ओली

18 असेनही जरी मी सर्वांनी सोडलेलामी फसलो म्हणूनी हसूदे वा चिडवूदे कोणी

मी फसलो म्हणूनी...

संदीप : या कवितेविषयी आधी थोडंसं सांगतो...की हातामधून हात सुटून जातो, पण जे काही थोडे क्षण एकमेकांच्या वाट्याला आलेले असतात, ते मात्र मनामध्ये अमर होऊन रहातात. आणि या क्षणांकडे बघून जे म्हणावसं वाटतं, ती ही कविता -

मी फसलो म्हणूनी हसूदे वा चिडवूदे कोणी
ती वेळच होती वेडी अन् नितांत लोभसवाणी

ती उन्हे रेशमी होती, चांदणे धगीचे होते
कवितेच्या शेतामधले ते दिवस सुगीचे होते
संकेतस्थळांचे सूर त्या लालस ओठी होते
ती वेळ पूरीया होती, अन् झाड मारवा होते

आरोहा बिलगायाचा तो धीट खुळा अवरोह
भरभरून यायचे तेंव्हा त्या दृष्ट नयनींचे डोह
डोहात तळाशी खोल वर्तमान विरघळलेले
अन् शब्दांच्या गाली पाणी थोडेसे ओघळलेले

ती हार असो वा जीत, मज कुठले अप्रूप नाही
त्या गंधित गोष्टीमधला क्षण कुठला विद्रूप नाही
ती लालकेशरी संध्या निघताना अडखळलेली
ती निघून जातानाही, बघ ओंजळ भरूनी ओली

14. कितीक् हळवे, कितीक् सुंदर,

कितीक् हळवे, कितीक् सुंदर, किती शहाणे आपूले अंतर...
त्याच जागी त्या येऊन जाशी, माझ्यासाठी... माझ्यानंतर...
कितीक् हळवे, कितीक् सुंदर...

अवचीत कधी सामोरे यावे...
अन् श्वासांनी थांबून जावे...
परस्परांना त्रास तरीहि, परस्पराविण ना गत्यंतर...

कितीक् हळवे, कितीक् सुंदर, किती शहाणे आपूले अंतर...

मला पाहुनी... दडते-लपते,
आणिक तरीहि... इतूके जपते...
वाटेवरच्या फुलास माझ्या... लावून जाते हळूच फत्तर

भेट जरी ना ह्या जन्मातुन,
ओळख झाली इतकी आतून...
प्रश्न मला जो पडला नाही... त्याचेही तुझ सुचते उत्तर

कितीक् हळवे, कितीक् सुंदर, किती शहाणे आपूले अंतर...

मला सापडे तुझे तुझेपण,
तुझ्या बरोबर माझे मीपण...
तुला तोलुनी धरतो मि अन्, तु ही मजला सावर् सावर...

कितीक् हळवे, कितीक् सुंदर, किती शहाणे आपूले अंतर...

मेघ कधी हे भरुन येता,
आबोल आतून घुसमट होता...
झरते तिकडे पाणि टप् टप्... अन् इकडेही शाई झर् झर्...

कितीक् हळवे, कितीक् सुंदर, किती शहाणे आपूले अंतर...
त्याच जागी त्या येऊन जाशी... माझ्यासाठी... माझ्यानंतर...
किती शहाणे आपूले अंतर...

- संदिप खरे

15. जुबा तो डरती है कहने से

apratim gazal aahe hee 1
जुबा तो डरती है कहने से
पर दिल जालीम कहता है
उसके दिल में मेरी जगह पर
और ही कोई रहता है ॥ धृ ॥

बात तो करता है वोह अब भी
बात कहाँ पर बनती है
आदत से मैं सुनती हूँ
वोह आदत से जो कहता है ॥ १ ॥

दिलमें उसके अनजाने
क्या कुछ चलता रहता है
बात बधाई की होती है
और वोह आखें भरता है ॥ २ ॥

रात को वोह छुपकेसे उठकर
छतपर तारे गिनता है
देख के मेरी इक टुटासा
सपना सोया रहता है ॥ ३ ॥

दिलका क्या है,
भर जाये या उठ जाये,
एक ही बात...
जाने या अनजाने
शिशा टूटता है तो टूटता है ॥ ४ ॥

* संदीप खरे *

16. मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो,
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो.

मी जुनाट दारापरी किरकिरा बंदी,
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वछंदी,
मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो,
तो लंघुन चौकट पार निघाया बघतो.

डोळ्यात माझीया सुर्याहुनी संताप,
दिसतात त्वचेवर राप उन्हाचे शाप,
तो त्याच उन्हाचे झगझगीत लखलखते,
घड्वून दागिने सुर्यफुलांपरी झुलतो.

मी पायीरुतल्या काचांवरती चिडतो,
तो त्याच घे‌ऊनी नक्षी मांडून बसतो,
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती,
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनने हरतो.

मी आस्तिक मोजत पुण्या‌ईची खोली,
नवसांची ठेवून लाच लावतो बोली,
तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या
अन धन्यवाद देवाचे घेवून जातो.

मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार,
लपतो न परि चेहरा आत भेसूर,
तो फक्‍त ओढतो शाल नभाची तरीही,
त्या शाम निळ्याच्या मोरपीसापरि दिसतो

Friday, August 7, 2009

13. करु वाटे खरे तर तुला एक फोन

करु वाटे खरे तर तुला एक फोन
यावा वाटे खरे तर तुझा एक फोन
असे काही होत नाही मग उगाचच
याला कर फोन कधी त्याला कर फोन

फोन तुझा सदा चालू कधी बंद नाही
आणि त्याला तारेचाही आता बंध नाही
पक्षापरी निरोपांची हवेतून ये-जा
हातातून तो ही परी झेपावत नाही
हातामध्ये फोन तरी प्रश्ण एवढाच
बोलायचे काय आणि बोलणार कोण

कसा बघ फोन माझा गावोगाव फ़िरे
हातातल्या हातामध्ये एकटाच झुरे
ह्रदयात साठवल्या काही जुन्या खुणा
टाकवेना फोन बाई जरी झाला जुना
पुन्हा पुन्हा करतो मी बटणाशी चाळा
पुन्हा पुन्हा बदलतो रींगरचा टोन !

खिडकीत साधुनिया सिग्नलचा कोन
कसे कसे किती किती बोलायचा फोन!
आता कसा उगामुगा वरवर बोले
जिभेवर जसे काही त्याच्या वारे गेले !
गोड गोड बोलायला एकटा मी पुरे
भाडायला तरी सखे लागतात ना दोन !

12. नसतेस घरी तू जेव्हा

नसतेस घरी तू जेव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो

नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो
ही धरा दिशाहीन होते
अन्‌ चंद्र पोरका होतो

येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकुन वारा
तव गंधावाचून जातो

तव मिठीत विरघळणाऱ्या
मज स्मरती लाघववेळा
श्वासाविण ह्रुदय अडावे
मी तसाच अकंतिक होतो

तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा ?
समईचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो

ना अजून झालो मोठा
ना स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो !

गीत - संदीप खरे

11. मेघ नसता वीज नसता, मोर नाचु लागले,

मेघ नसता वीज नसता, मोर नाचु लागले,
ज़ाहले इतुकेच होते कि तुला मी पाहिले

गोरट्या गालावरी का चोरटा हा रक्तिमा,
तू मला चोरून बघताना तुला मी पाहिले

एवढे नाजूक आहे वय तुझे माझ्या फ़ुला,
रंग देखील पाकळ्यांवर भार वाटू लागले

लाख नक्षत्रे उराशी नभ तरीही हळहळे,
हे तुझे नक्षत्र वैभव का धरे वर राहिले ?

पाहता तुज रंग उडुनी होई गजरा पांढरा
शल्य हे त्याच्या उरातील बघ सुगंधू लागले
भर पहाटे मी फ़ुलांनी दृष्ट काढून टाकली,
पाहती स्वप्नी तुला जे भय तयांचे वाटले

मेघ नसता वीज नसता, मोर नाचु लागले,

ज़ाहले इतुकेच होते कि तुला मी पाहिले

- संदिप खरे

10. आयुष्या वर बोलू काही

जरा चुकीचे... जरा बरोबर......
जरा चुकीचे, जरा बरोबर , बोलू काही.....
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही......

उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू ..
उगाच वळसेे शब्दांचे हे देत रहा तू ....
भीडले नाहीत डोळे तोवर , बोलू काही......
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही..........

तूफान पाहून तीरा वर , कुजबुज्ल्या होडया ..
तूफान पाहून तीरा वर , कुजबुज्ल्या होडया ....
पाठ फीरू दे त्याची, नंतर बोलू काही........
चला दोस्त हो ;आयुष्या वर बोलू काही..........

हवे-हवे से दुखः तुला जर, हवेच आहे ..
हवे-हवे से दुखः तुला जर, हवेच आहे ....
नको-नको से हळवे कातर, बोलू काही.......
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही..........

"उदया-उदया" ची कीती काळजी , बघ रांगेतुन..
"उदया-उदया "ची कीती काळजी , बघ रांगेतुन....
"परवा" आहे "उदया"च नंतर, बोलू काही........
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही..........

श्ब्द असू दे हातां मध्ये, काठी म्हनुनी..
श्ब्द असू दे हातां मध्ये, काठी म्हनुनी....
वाट आंधळी, प्र्वास खडतर ,बोलू काही .......
चला दोस्त हो , आयुष्या वर बोलू काही..........

चला दोस्त हो , आयुष्या वर बोलू काही..........

* संदीप खरे

9. दुपार

दुपार . . .

अशी दुपारली वेळ, नभी भरलेल्या सरी

जीव घेत घेत माझा कोण उभे माझ्या दारी

किती जपून ठेवले गुज ओठावर आले

साऱ्य़ा सयीचे वऱ्हाड मेघा का रे बोलवले ?


दूर वाजते सनई तिला आभाळ पुरेना

मनातली हुरहुर जशी मनात मावेना

माझ्या मनात मांडव असा सहजी पडेना

आर्त मनाचे मनाचे जगभर सांगवेना


आता तरी दे ना दे ना मनातले आवताण

मनातल्या माणसाला येवो माझ्या देहभान

आता येथोनीच थांब नको मनभर होऊ

माझ्या कोशात मी बरा तिथे हाक नको देऊ


हाकेतुन तरी काय ? स्वर पाण्याचा पाण्याचा

तुझे आकाश पाण्याचे . . माझा डोळाही पाण्याचा

इथे पाणी तिथे पाणी . . एवढेच ना करणे

उन्हे पडल्यावरती पुन्हा भाजुन निघणे . . .


आता अंथरून वेळ पुन्हा पाय पसरीन

आणि कोसळता सरी आत आत पाझरीन. . .


- संदिप खरे

8. हे गंधित वारे फिरणारे

हे गंधित वारे फिरणारे
घन झरझर उत्कट झरणारे . . .
हे परिचित सारे पूर्वीचे . . .
तरी आता त्याही पलिकडचे . . .
बघ मनात काही गजबजते . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .

कुठल्या देशी नकळत माझे पाऊल पडले रे
सूर रोजचे कसे नव्याने मनास भिडले रे
हे गीत जयाला पंखसुध्दा . . .
अन हवाहवासा डंखसुध्दा . . .
कधि शंकित अन नि:शंकसुध्दा . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .

मनात जे जे दडून होते नकळत आकळते
कसे दुज्याच्या स्पर्शाने 'मीपण' झगमगते
ही जाणीव अवघी जरतारी . . .
हर श्वासातुन परिमळणारी . . .
हर गात्रातुन तगमगणारी . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .

नाव न उरले, गाव न उरले, अवघे ओसरले
बेभानाचे भान जिण्याला बिलगुन बसलेले
हा स्पर्श विजेच्या तारांचा . . .
हा उत्सव बघ अस्वस्थाचा . . .
हा जीव न उरला मोलाचा . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .

-संदिप खरे

7.अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा

अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा

अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥धृ॥

आमच्या देखिल मनी आले चांदण्याचे पुर
आम्हालाही दिसल्या शम्मा अन शम्मेचे नूर
अजुन तरी परवाना हा शम्मेपासुन दुर
मैत्रिणीच्या लग्ना गेलो घालुन काळा झब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥१॥

कुणी नजरेचा ताणुन बाण केलेली जखमी
कुणी ओठांची नाजुन अस्त्रे वापरली हुकमी
अन शब्दांचे जाम भरुन पाजियेले कोणी
मयखान्यातही स्मरले आम्हा मंदिर मस्जिद काबा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥२॥

कधी गोडीने गाउ गेलो जोडीने गाणी
रमलो हे जरी विसरुन सारे आम्ही खुळ्यावानी
सर्वस्वाचे घेउनी दाने आले जरी कुणी
अजुन तरी सुटला नाही हातावरचा ताबा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥३॥

कोण जाणे कोण मजला रोखुन हे धरते
वाटा देती हाका तरिही पाउल अडखळते
कुठल्या शपथेसाठी माझी ओंजळ थरथरते
मोहाहुन ही मोहक माझी हुरहुरण्याची शोभा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥४॥

अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ...

6.आठवतं तुला ?

आठवतं तुला त्या भेटीत

रिमझिम सरींनी छेडलं होतं .

भर दुपारी मला जणू

चांदण्याने वेढलं होतं .

आठवतं तुला त्या भेटीत

श्रावण धुंद बहरला होता .

ओल्या ऋतूत ओल्या स्पर्शाने

ओला देह शहारला होता .

आठवतं तुला त्या भेटीत

दोघे व्याकुळ झालो होतो .

तुझा गंध वेचता वेचता

मीही बकुळ झालो होतो .

आठवतं तुला त्या भेटीत

भावनांनी कविता रचली होती .

माझ्या डोळ्यात तू अन

तुझ्या डोळ्यात मी वाचली होती.

आठवतं तुला त्या भेटीत

आणखी काय घडलं होतं ?

मला स्मरत नाही पुढचं

बहुतेक तेव्हाच स्वप्न मोडलं होतं .



- संदिप खरे

5. आता उरले ना दिस; रूसण्याचे-भांडण्याचे

आता उरले ना दिस; रूसण्याचे-भांडण्याचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ धृ ॥

किती काळ रहायचे; मान-अपमानी दंग,
पहा लकाके नभात; कसा शेवटला रंग.
कोण जाणे कोण्या क्षणी; सारे सोडून जायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ १ ॥

जरी भांडलो-तंडलो; तरी तुझीया सोबती,
दिली दुर्दैवाला पाठ; अन्‌ संकटाला छाती.
सारे कठीण; तुझीया सवे मृदूल व्हायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ २ ॥

काही उणे माझ्यातले; काही दुणे तुझ्यातले,
बघ शेवटास सारे; कसे सुखमय झाले.
जन्मी पुढल्याही होऊ; अजूनही ओळखीचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ ३ ॥

कष्ट, ध्यास, त्रागा, प्रेम, जिद्द, तडजोड, भीती,
जे जे झरले ते पाणी; आणि उरले ते मोती.
येत्या उद्याने जपावा; असा शिंपला व्हायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ ४ ॥


--- संदीप खरे.

4. हृदय फेकले तुझ्या दिशेने

हृदय फेकले तुझ्या दिशेने
झेलाया तू गेलीस पटकन्‌
गफलत झाली परि क्षणांची
पडता खाली फुटले खळ्‌कन्‌


हृदय फेकले तूही जेंव्हा
सुटले तेही,पडलेही पण
तुटले नाही-फुटले नाही
नाद निघाला केवळ खण्‌कन्‌


गोष्ट येवढी इथेच थांबे
अशा गोष्टींना नसतो नंतर
खळ्‌कन्‌ आणि खण्‌कन्‌ यांतील
कधी कुठे का मिटले अंतर


मन पोलादी नकोच तुजसम
असो असूदे काच जरीही
फुटून जाते क्षणी परंतु
गंजायाची भीती नाही

--- संदीप खरे.

3. बॉस .....

बॉस .....
बॉस खुप उशिरापर्यंत थांबायचा आणि वैताग आणायचा...
लाल लाल कंटाळल्या डोळ्यांनी काम करत रहायचा...
आम्ही घरी निघालो की चुकचुकायचा...

मी लग्नाळलेला... वाटायचं- 'चांगलं घरी जायचं सोडून
कसलं हे उकरून उकरून काम करत रहाणं !'...

यथावकाश माझं लग्न झालं...
नव्या नवलाईचे पक्षी घरटं सोडेना झाले...
बघता बघता 'अतिपरिचित' झाले....

आणि हळूहळू पंख सैलावत जाताना
घरटयाची हाक आत तेवढीशी तीव्र उरली नाही...

आता बॉसला 'थांब' सांगावं लागत नाही...
केबिनमध्ये तो आणि केबिनबाहेर मी
एकमेकांना सोबत करत बसलेलो असतो...
कंटाळ्यातील भागीदारांच्या समजुतदारपणाने
घरी न जाता काम करत रहाण्याची 'अनिवार्यता'
दोघांनाही आता घट्ट धरून ठेवते...

उकरून उकरून काम करत प्रश्नांशी भांडत बसण्यापेक्षा
उकरून उकरून काम करणे सोपे असते,
हे निर्जन ऑफिसमधल्या सुन्न रात्रींशी
गुपचुप कबुल केलेए आहे मी...

- संदिप खरे

2. हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही

हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही
हसलो म्हणजे दुखीः नव्हतो ऐसे नाही

हसलो म्हणजे फ़क्त स्वतःच्या फ़जितीवर
निर्लज्यागत दिधली होती स्वतःच टाळी
हसलो कारण शक्यच नव्हते दुसरे काही
डोळ्यामधे पाणी नव्हते ऐसे नाही

हसतो कारण तुच कधी होतीस म्हणाली
याहुन तव चेहर्‍याला काही शोभत नाही
हसतो कारण तुला विसरणे जितके अवघड
तितके काही गाल पसरणे अवघड नाही

हसतो कारण दुसर्‍यानांही बरे वाटते
हसतो कारण तुला सुद्धा ते खरे वाटते
हसलो म्हणजे फ़क्त डकवली फ़ुले कागदी
आतुन आलो होतो बहरुन ऐसे नाही

हसतो कारण जरी बत्तीशी कुरुप आहे
खाण्याची अन दाखवण्याची एकच आहे
हसतो कारण सत्याची मज भिती नाही
हसतो कारण हसण्यावाचुन सुटका नाही....


"हसलो" च्या जागी "हसतो" नक्की कुठल्या कडव्यात सुरु होते यामध्ये confusion आहे....pls correct if its wrong....

1.Blank Call

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
बोलतच नाही मुळी पलीकडे कोणी
ऐकू येत रहातं फक्त डोळ्यातलं पाणी ...(१)

कळताच मलाही मग थोडंसं काही
मीही पुढे मग बोलतंच नाही
फोनच्या तारेतून शांतता वाहते
खूप खूप आतून अजून काही सांगते ...(२)

नदी नि शेतं नि वार्‍याची गिरकी
ढगाची विजेने घेतलेली फिरकी
वाळूवर काढलेली पाण्याची चित्रं
"तुझा" पुढे मी खोडलेला "मित्र" ...(३)

टपला नि खोड्या नि रुसवे नि राग
एकदा तरी सहज म्हणून शहाण्यासारखं वाग
हसायचे ढीगभर नि लोळून लोळून
बोलायचे थोडेच पण घोळून घोळून...(४)

वडाचे झाड आणि बसायला पार
थंडीमधे काढायची उन्हात धार
कॉफी घेउन थोडेसे बोलायचे कडू
हसताना पहायचे येते का रडू ...(५)

बोलायचे गाणे आणि बोलायची चित्रं
नुसतीच सही करुन धाडायची पत्रं
क्षणांना यायची घुंगरांची लय
प्राणांना यायची कवीतेची सय...(६)

माणूस आहेस "गलत" पण लिहितोस "सही"
पावसात भिजलेली कवीतांची वही
पुन्हा नीट नव्याने लिहीत का नाहीस?
काय रे.... काही आठवतय का नाही?
शब्दसुद्धा नाही तरी कळे असे काही
हातामधला हात सुद्धा जितकं बोलत नाही...(७)

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
दोन्ही कडे अबोला आणि मध्यात कल्लोळ
छाती मधे घुसमटतात हंबरड्यांची लोळ...(८)

ऐकू येतात कोंडलेले काही श्वास फक्त
कोणासाठीतरी खोल दुखलेलं रक्त
गरम होतात डोळे नि थरथरतो हात
सर्रकन निघते क्षणांची कात...(९)

उलटे नि सुलटे कोसळते काही
मुक्यानेच म्हणतो "नको... आता नाही"
फार नाही... चालतो मिनिटे अवघी तीन
तेवढ्यात जाणवतो जन्माचा शीण
तुटत गेले दोर आणि उसवत गेली वीण
डोळे झाले जुने तरी पाणी नविन...(१०)

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन....

....संदिप